New Release
भारत
प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास सांगणारे पुस्तक म्हणजे ‘भारत.’
भारताच्या प्राचीन इतिहासाची जी पुस्तके आहेत, त्यांत एकाच साचेबद्ध पद्धतीने इतिहास सांगितला आहे. त्याच्यामध्ये खूप बिंदू जोडले गेलेले नाहीत. पाश्चिमात्य इतिहासकारांनी जसा इतिहास लिहिला, त्याचीच री पुढे ओढली गेली.
मात्र, त्यात बर्याच गोष्टी सुटल्या. दुर्दैवाने, त्यांचा एकत्रित विचार झालेला नाही. दुसरे म्हणजे, ऋग्वेद, पुराणे यांत इतिहास म्हणून जे उल्लेख आहेत, त्यांचा इतिहासाच्या मुख्य प्रवाहात समावेश झालेला नाही. ऋग्वेदातील दाशराज युद्ध, महाभारताचे युद्ध ज्यामुळे भारताचा भूराजकीय इतिहास बदलला, त्याचा समावेश आपण इतिहासात करत नाही. त्यामुळे, इतिहासाचा पुन्हा एकवार सांगोपांग विचार करण्याची गरज मला वाटली आणि त्यातूनच हे पुस्तक तयार झाले आहे.
उद्योजक, लेखक
हर्षद माने
या पुस्तकासाठी मी २०१९ पासून संशोधनाचे काम सुरू केले. त्यामुळे मला पुस्तक लिहायला सहा वर्षे लागली. ‘कोरोना’ काळात लिखाणासाठी थोडा अधिक वेळ मिळाला. ‘कोरोना’आधी मी ‘यूपीएससी’साठी इतिहास शिकवत होतो. त्यावेळेस मला या विषयावर मराठीमध्ये संदर्भपुस्तक हवे असे वाटले. त्यातून मी हे पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. मात्र, नंतर मला असे वाटले की, आपल्या देशाचा इतिहास ललित ओघवत्या भाषेत लिहिला, तर सामान्य वाचकांनासुद्धा वाचायला आवडेल. त्यामुळे पुस्तकाची पुनर्रचना केली.